Sunday, April 24, 2011

क्षणभर विश्रांती- भाग-१

ठिकाण : conference room 
वेळ : दुपारी २:३०
साधारण ४-५ माणसांचा थवा संशयास्पद हातवारे करत काहीतरी गहन चर्चेमध्ये बुडून गेला होता....तेवढ्यात त्यातील एकाने speaker phone वरून कोणालातरी फोन लावला...दूरध्वनी ची कर्कश्य रिंग वाजली आणि तिकडून आवाज आला........

व्यक्ती १: नमस्कार 
व्यक्ती २: काय करतोयस?
व्यक्ती १ : काही नाही..आपण कोण?
व्यक्ती २ : मग ये conference room मध्ये...
व्यक्ती १ : का?
व्यक्ती २: काही खास बोलायचे आहे....लवकर ये!

अतिशय गंभीर चेहरा करून व्यक्ती १ conference room मध्ये पोहचली आणि.......सगळे जोरात हसायला लागले...अनिकेतला (व्यक्ती १) काही सेकंद काहीच झेपले नाही. चेहऱ्यावरील एकही रेष हलू न देत तो खुर्चीवर बसला आणि समोरील हसणारे चेहरे पाहून विचारू लागला..."स्नेहा (व्यक्ती २) कश्याला बोलावले मला?" 

"अरे असेच बोलावले तुला..आम्हाला खूप कंटाळा आला आहे office च्या routine चा म्हणून सगळे एकत्र येऊन ट्रीप प्लान करतोय..तू येणार आहेस का?"

अनिकेत तसा आमच्या सगळ्यांमध्ये नवा होता..या ऑफिस मधील त्याच्या अनुभवाच्या पुढे आम्ही सगळेच त्याला senior होतो...आमचा असा नवा चेहरा बघून अनिकेत फारच चकित झाला असावा..असा ट्रीप साठी conference room मध्ये जमा होणे आणि गंभीर चेहऱ्याने विनोद करत ट्रीप ची चर्चा करणे..हे त्याला नवीन असावे बहुतेक..

पण म्हणतात ना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण...तिथे conference room मध्ये जमलेल्या प्रत्येकाची मनस्थिती काहीशी सारखीच होती...काम आणि काम! याच्या पलीकडे स्वत:साठी आपल्या कुटुंबासाठी वेळ चोरावा लागत होता! 

स्नेहा आणि अमोल एकाच बोटीमध्ये सवार होते..पण त्यांची बोट कोणीतरी तिसरेच लोक चालवत होते..यांनी पूर्व म्हटले कि यांची बोट दक्षिणेला वळली म्हणून समजा! :-)

दिनेश आणि सौ.दिनेश पुणे दर्शन करून झाले म्हणून आता महाराष्ट्र दर्शन साठी सज्ज झाले होते...तेवढेच नव्याने एकमेकांना ओळखण्यासाठी हे नवीन जोडपे तयार होते.. 

प्रकाश खूप दिवसांनी (वर्षांनी ?) काम आले म्हणून कंटाळला होता..मी बरेच दिवस खूप काम करून कंटाळले होते. एकदा सहज गप्पा मारताना प्रकाशने त्याच्या गावी जायचा का ट्रीपला? असा विषय काढला. "माझे गाव छान आहे मस्त समुद्रकिनारा आहे तिकडे..तसही मी दर शनिवारी-रविवारी जातोच तिकडे..माझ्या बायकोने संगीत नाटकामध्ये भाग घेतला आहे..त्याच्या तालमी सुरु आहेत सध्या." मला हा प्रस्ताव आवडला आणि आमची ट्रीप उत्सुक माणसांची जमवा-जमाव करायला सुरुवात झाली! 
त्यातील पहिला चर्चेचा पडाव म्हणजे आमची ही conference रूम मधील  सभा!

हा, तर वर सांगायचेच राहिले कि अनिकेतनेही लगेच होकार सांगितला. बहुमताने ट्रीपचे ठिकाण ठरले-आंजर्ले!

आमचे ट्रीप चे विचारांचे घोडे एकदाचे मैदानात उतरले..जगात असतील नसतील असे सगळे अडथळे आमच्या ट्रीपच्या मध्ये आले..कधी गाडीच नाही तर कधी ट्रीप मधील सभासद गायब! फ़क़्त मनाच्या इच्छाशक्तीने एकदाची ट्रीप ची तारीख ठरली. बाप्पा मोरया म्हणत २६ मार्च २०११ ला आमच्या गाडीची चाके आंजर्ले च्या दिशेने धाउ लागली.

तसे ऑफिसमध्ये आपण खूप गप्पा मारतो पण ट्रीप म्हणजे कशी धमाल हवी...म्हणून आमच्या बरोबर दोन खास व्यक्तींना आम्ही घेऊन चाललो होतो..त्या दोघी म्हणजे जणू  आमच्या दुनियेतील परी! जितक्या गोंडस तितक्याच हजार जवाबी! एक प्रकाश ची सुकन्या चि.गार्गी आणि दुसरी माझी भाची चि.वेदिका.



आमची गप्पांची गाडी तशी हळुच सुरु झाली.....अगदी सभ्यपणे आम्ही मुली विरुद्ध मुले अशी गाण्यांची अंताक्षरी सुरु केली..छान न्याहारी केली आणि गप्पांची गाडी सरळ ५ व्या गेअर मध्ये पाळायला लागली...शायरी, चारोळ्या, सुंदर किस्से, जुन्या आठवणी यांनी पुढचा प्रवास रंगतदार झाला..इतका वेळ शांत असणारी वेदिका आणि गार्गी एकदम रंगात आल्या...वेदिकाने मग तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले..मागील seat वर बसलेल्या अमोल आणि अनिकेत यांना नायकाचे चे काम दिले..तिच्या चित्रपटात नायिका नसल्याने मी आणि स्नेहा आनंदाने दोघांची तारेवरील कसरत बघत होतो..मग चित्रपट संपला आणि तिचा पाककृतीचा कार्यक्रम सुरु झाले..मला खात्री आहे अमोल आणि अनिकेत आयुष्यात एकदा तरी तिने शिकविलेले पदार्थ बनवण्याचं धाडस करतील ;-)
  गार्गी एकदम सही मूडमध्ये होती..ती आमच्या अंताक्षरी मध्ये कोणताही गाणे चालू असेल तरी त्याच लयात फ़क़्त एकच गाणं म्हणायची..."अग बाई sss ढग बाई sss"...आमचा एकवेळ ताल चुकेल पण तिचा गाणं अखंड चालू होते :-)...ती नवीन नवीन बोलायला शिकत होती म्हणून कि काय पण ती आपण बोलू ते वाक्य आहे तसा परत बोलायची... तिची आई पाणी पिणार असेल तर लगेच गार्गी म्हणायची.." गाडी थांबलीय गार्गी पाणी पिणार आहे" ...एवढे गोंडस, निरागस प्रवासी असतील तर कोणाला प्रवासाचा थकवा जाणवेल! :-)
 मागे एवढा दंग चालला होता तरी प्रकाश गंभीर चेहऱ्याने रस्ता-शोध मोहिमेमध्ये गुंग होता..त्याच्या भ्रमर-ध्वनी च्या सहाय्याने आम्ही आंजर्ले ला पोहोचलो..सगळ्यांनी समुद्रकिनारा दुरून पाहिला आणि "वाह" अशी दाद देत आम्ही आमच्या रूम वर पोहचलो.