Wednesday, April 8, 2015

आजी आणि माती

पहाटे ४ वाजले होते, मुसळधार पाऊस  पडत होता, सुसाट वारा झाडांच्या फांद्यातून पाने उडवत होता. काही घरे शांत झोपली होती, काही खिडक्या वाजत होत्या. टीम टीमणारे  दिवे काळोख पुसत होते. विजांची दिशा व्यापत आकशामध्ये थैमान घालत होत्या. गावातील शांतता आता वादळाने भंग केली होती आणि वेशी पाशी असणारया मंदिरातील दिव्याची ज्योती मंदपणे झळकत सगळा पाहत होती . कच्चे रस्ते पाचोळा, माती वाहत घेऊन पाण्याच्या धारा नदीकडे धावत होत्या. मोठी झाडे मोडून पडली होती आणि फुलांची आरास अंगणामध्ये होत. त्यातून वाट काढत थरथर कापत एक सावली दारापाशी आली, आडोसा बघून पायरीवर विसावली.
ढगांचा मनसोक्त पाण्याशी खेळ झाला आणि स्वारी आकाशातून वारा नेईल तिकडे निघून गेली . एव्हाना सुर्य प्रकाश घेऊन ओल्या जगाला सोनेरी करून गेला होता. ती साखर झोपेतून जागी झाली. रोजच्या दिन क्रमाप्रमाणे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत जमिनीला नमस्कार केला. तेवढ्यात दाराची बेल वाजली "दूधवाला आला असेल, त्याला सांगायचे होते आज जरा जास्त दुध हवे". सोमवार, शिवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करायचा कधी विसरली नाही ती.
आजी : "बर आहे न सगळा नाम्या , वेळ लावला आज यायला " दूधवाल्याला आपुलकीने विचारले.
दूधवाला नाम्या : " अव काय सांगायचा, लई थैमान घातलाय पावसान रातच्याला, तुमचा सोमवार हाय नव्ह आलो बघा दुध द्यायला वाट काढत".
आजी: "खुश रहा बाळ " तिने कौतुक केले
नाम्या : "काय आजी, पावन आल्यात दिसतंय. पण हित दाराभाहीर काय म्हणून झोपवलय?" पायरी वर अंग चोरून झोपलेल्या व्यक्ती कडे बोट करत नाम्याने आजीला विचारले
आजी: " कोण आहे तिकडे?" आजीने आवाजाला काळजीचा सूर लावत विचारले

"मी हाय जी, माती" डोळे चोळत वर बघत व्यक्तीने उत्तर दिले.

आजी: "माती ? अग बाळ, नाव विचारले मी तुझे. काल पावसात रस्ता चुकलीस का?"

माती: " माती नाव हाय जी  माज. पोरटी नग व्हती जी  बापाला, म्हणून माईन नाव ठेवलयजी. ती म्हणायची धरणी सामद्यांची आय असते. तुले तिच्या कडे राहावे लागेल. बाप तर नाई ठेऊन घेणार घराला. रातच्याला लई पाणी बरसले जी म्हणून हितच निवारा घेतला जी. निघतो आता" अस म्हणत माती चटकन उठली. विस्कटलेले केस कसेबसे सावरले आणि गाठोडे घेतले.

आजी: " बरच बोलतेस ग एवढ्याश्या वयामध्ये , कुठे जाणार एकटी ?चहा घेऊन जा हो घोटभर" आजीने प्रेमाने हात फिरवला मातीच्या डोक्यावरून.

माती: " मी? म्होरल्या शालेला जाणार है जी. शाला झाडतो जी म्या. गुरुजी मला मग गणित शिकावित्यात ५ वी तुकडीच"

आजी: "अरे वाह! चल मग सांग बघू ४ गुणिले ५ किती?" आजीने मातीची फिरकी घ्यायला प्रश्न केला

माती: "सोप्पा हाई कि, २० आणि काय! पाढ पाठ केल्याविना जेवत नाई." समोरचे दोन तुटलेले दात लपवत माती गालात हसली.

आजी: "शाब्बास! माझ्याकडे बाजाराचे काम करणार का? तुला शाळेचा गणवेश आणि पुस्तके मी घेऊन देईन" आजीने विचारले

माती: "व्हय जी" अस म्हणत माती उड्या मारत अंगणभर नाचली

आजीने मातीला परिसाचा स्पर्श करावा तसे सोनेरी संस्कार दिले. तिला खूप शिकविले अगदी तिच्या इतर नातवंडानचे जसे लाड करते तसेच. मातीचे १० चे शिक्षण पूर्ण झाले तिने आजीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
आजी: "खुश रहा पोरी. अशीच यशस्वी हो"
माती: " आजी आज गेली ५ वर्ष तू माझा सांभाळ करतेस. तुला एक विचारू का?" मातीने आवाजाला आदराची समज देऊन परवानगी मागितली
आजी: "विचार न बाळ."
माती : "आजी तुझी एवढी मुले कशी सांभाळतेस ग? तू माझे नाव मातीच का राहू दिलेस?" एकाच श्वासात माती ने सगळे प्रश्न विचाराचे ठरवले होते
आजी: " माती, नाव हि आपली ओळख नसते,  आपण नावाला ओळख देतो. आपली वागणूक, आपली विचारसारणी याने नावाला परिपूर्णता मिळते. तुझ्या वडिलांना तू मुलगी म्हणून नको होतीस. तुझ्या आईला तूला जगताना पहायची ओढ होती. तिने तुला जे नाव दिले त्या नावाने आजही ती तुला ओळखावी आणि तिच्या स्वप्नांना पूर्णता मिळावी. हीच माझी इच्छा होती. माती, यासाठीच मी तुझे नाव नाही बदलले.
आपले मुल ज्या दिशेने धावते ती आईसाठी प्रकाशाची दिशा असते. मुल दिसानसे झाले कि मागे उरतो तो फक्त काळोख." मोठा नि:श्वास सोडत आजी एक क्षण  थांबली आणि परत सांगू लागली "माझा प्रकाश एका वादळात हरवून गेला. शेवटचे पहिले तेव्हा तुझ्याच वयाची असतील माझी मुले." आजीच्या डोळ्यातून पाणी आले. माती पुढे आली आपला आधार द्यायला. आजी म्हणाली" आपण एकटेच असतो, पण फ़क़्त तोपर्यंत जोपर्यंत आपण कोणाचा एकटेपणा दूर करत नाही." अश्रू लपवत पुढे म्हणाली" ज्या क्षणी मी एकटी झाले त्या क्षणी मी ठरवले, कोणालाही मायेची गरज आहे त्यांना हात द्यायचा. बघत बघत अनेक मुले जोडली गेली. आता ती सारी शिकून मोठी झाली आहेत. आज बघ माझा हात तुझ्या हाती आणि तुझे हात अजून कोणाच्या हाती देशील तर जग प्रेमाने भरून जाईल"

मातीने आजीला वचन दिले कि ती तिच्यातील माणुसकी जपेल. माणुसकीला प्रेमाने गुणले आणि व्देशाला मायेने भागले तर जग कित्ती सुंदर होईल, हो न? 





रंगीलो राजस्थान भाग-१

आनंदाचे डोही, आनंद तरंग!! वाह, चक्क ऑफिस मधून १० दिवस सुट्टी मिळाली. सहलीसाठी सामानाची खरेदी, packing लिस्ट सुरु झाली आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण १०० टक्के वाढले आहे असे वाटू लागले! विमानातून जयपूरकडे जाताना वाटले आपल्या स्वातंत्र्याला पंख मिळाले.
जयपूरमध्ये आगमन केले आणि थंड हवेच्या  गारव्याने हसत स्वागत केले. मउ शाल आणि रंगीत टोपीतून मिळणारी उब आणि हवेतील कधी धुसर तर कधी कडक थंडीचा स्पर्श मस्त वाटत होत. मनाला तजेला मिळाला. आता आम्ही वाट बघत होतो ते सहलीमधील इतर नवीन प्रवाशांची.
स्मित हास्य देऊन बराच वेळ आमच्याकडे पाहणारे एक म्हातारे जोडपे दिसले. आम्हीपण हसलो त्यांच्याकडे पाहून आणि भली मोठी कपड्यांची गाडी (bag ) घेऊन त्याच्या शेजारी जाऊन उभे राहिलो. तसे गोरेपान काका म्हणाले " I am Kobad from Canada .  This is my wife " गालावरील दोन्ही खळ्या थंडीने गुलाबी झालेल्या गालावर मिरवीत काकूंनी नाजूक smile दिली . काकांचे नाव तसे चार चौघापेक्षा वेगळे होते म्हणून आम्ही परत विचारले. तसे काका निळे डोळे मोठे करत म्हणाले माझ्या आईला मी दंगा करायचो म्हणून नाई आवडायचो न म्हणून तिने माझे नाव ठेवले ko-bad आणि मिस्किल हसू दिले. आम्हीही हसलो आणि आमची ओळख करून दिली.
पिळदार मिश्या, मध्यम बांधा , केस सुट्टीवर गेलेले आणि बोलण्यात ठेका हि आज-काल दुर्मिळ झालेली व्यक्तिरेखा आमच्याकडे बघून आपल्या सौ. बरोबर बराच वेळ काहीतरी बोलताना मी तिरक्या नजरेमधून पहात होते. शेवटी राहवले नाही म्हणून मी काकांना स्मित हास्य दिले. नवरा-बायकोमधील नात्यातील आदरयुक्त भीतीची मला नेहमीच गम्मत वाटते पण इकडे प्रकरण खूपच मजेदार होते. काकूना सगळ्या आयुष्याच्या किल्ल्या देऊन काका निवांत मजा लुटत होते. त्यांच्या बोलण्याला विनोदाचा स्पर्श आणि वागण्याला रांगडी रंगीत सवय होती. काकूंनी काकांचे नाव अवलिया बाबा ठेवले होते असे आम्हाला समजले. इतर सहप्रवासी देखील त्यांना याच नावाने बोलावू लागले आणि काकांच्या अखंडित मजा-मस्तीचा आशीर्वाद लाभला.
आमची गाडी आली आणि सगळे दिलेल्या seat number वर जाऊन बसले. दंगेखोर मुलांना कसा शेवटचा  bench प्रिय तसा आम्हाला नशिबाने शेवटच्या seats मिळाल्या. आमच्या समोरील seats वर एक मारवाडी जोडपे होते. सगळी जवाबदारी मुलांना देऊन चार दिवस  बायकोबरोबर फिरायला आलेले काका शांत आणि गंभीर स्वरूपाचे असावे असे मला वाटले. काकू आणि काका यांची उंची लहान पण चेहयावरील भाव महा शांत होते. डॉक्टर फॅमिली , मुम्बई ची happy-go-lucky फॅमिली असो वा आयुष्यातील अनुभवान्नी समृद्ध झालेली जोड़पी, आत्ता पर्यंत ओळख झालेली मंडळी दिलसे दिलखुलास होती.
जयपूर ते रणथम्बोर हा प्रवास लोकांच्या स्वभावाचे शोध लावण्यामध्ये कसा पार पडला समजलेच नाही. आमचा team leader प्रवासाच्या पुढील कार्यक्रमाची घोषणा करायला उभा राहिला. त्याने जी काही माहिती सांगितली ती पुढील येणाऱ्या क्षणांची उत्चुकता १० पट करणारी होती." रंणथबोर मधील वाघ पाहण्यासाठी देशातून नाही तर परदेशातूनही लोक येतात. हा अनुभव जेवढा रोमांचकारी तेवढाच दुर्मिळ आहे. तुम्हा सर्वांना resort वर गेल्यावर १० मिनिटे आहेत जेवण करायला.  तिथून आपण जंगलातील खास गाडीने वाघ बघायला निघणार आहोत. " उबदार बस मधुन जसे सगळे बाहेर आलो तसे कडक थंडीने आम्हाला वेढले. मस्त गरम गरम जेवणावर ताव मारल्यावर आम्ही वाघोबा दर्शनसाठी निघालो. हा अनुभव आयुष्यातील रोमांचकारी अनुभव असणार आहे याची काहीच कल्पना नव्हती!
आम्हाला तसा बराच वेळ झाला होता. नियमानुसार कदाचित 5min आम्ही नाही पोहोचलो तर फक्त प्रवेश द्वाराचे दर्शन घेऊन परत यावे लागले असते. मन गाड़ी च्या पुढे धावत होते. आम्हाला प्रवेश मिळाला.पुढे काय दिसणार, कसा अनुभव येणार याचा विचार करत असतानाच एका प्राण्याचा आवाज आला. आमच्या guide ने सगळ्यांना शांत बसायला सांगितले.काही प्राणी तलवाजवळ होते ते जिव मुठीत धरून पळत होते.माकड़ झाडांच्या फांदीवरन सावध करत होते.आम्ही श्वास रोखून जंगलामधील हे दृष्य पहात होते. तेवढ्यात आमच्या गाइड ने गाड़ी मागे घेतली.आमचे डोळे समोरील रानवाटे कड़े होते. काही क्षण झाले आणि दिमाखात चालत वघोबा आला. मनात भिती होती ती वाघोबाच्या रूपाने व्यापुन गेली होती. त्यानेपण आमचा भाव ओळखला असावा. मनसोक्त दर्शन दिले.त्याची चाल, तो आवाज,ती झेप,तो बसण्या-उठण्यातील मानीपणा. वाह!क्या बात !क्या बात! क्या बात!!!