Thursday, June 27, 2013

Mrs. Perfect!


        आज खूप दिवसांनी स्वत:ला रोजच्यापेक्षा वेगळे बघायचे ठरविले होते. लहानपणी कसे आपण 'time  please ' म्हणायचो आणि काही सेकंदांनी खेळ परत सुरु व्हायचा तसेच काहीसे वाटत होते . कित्ती दिवस झाले मनात एक विषय घोळत होता. स्त्रिया पुरुषांपेक्षा आपले आयुष्य जास्त 'perfect ' असावे यासाठी धडपड करत असतात. सहजच कॉफी टेबल वर निघालेला विषय होता पण मनात आपलासा वाटला. 

          आपण आहोत तसे आहोत आणि काही झाले तरी बदलणार नाही असे मी तोऱ्यात सांगायचे. मला वाटायचे कि मी खूप वेगळी आहे. पण मला आत्ता समजतय कि मी लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चक्क आईसारखा वागायचा प्रयत्न करत होते. आई बनवते तसाच भाजीचा रंग आला कि मला १०० पैकी १०० गुण मिळाल्या सारखे वाटायचे. 'घर असे ठेवायला हवे, तशी शिस्त असायला हवी' हि कानाडोळा केलीली आईची वाक्ये आता सारखी मनात असतात. पाहुणे आली कि चांगली सून म्हणून , स्वयंपाक करायला गेले कि सुग्रण म्हणून मिरवायचा, घर आरश्याप्रमाणे चकचकीत-शिस्तीत ठेवायचा जणू मनाला आग्रह!शरीर दमून जाईल पण सगळे 'perfect ' झाल्याशिवाय झोपायचे नाही.  मग ऑफिसमध्ये पण आपण हुशार आहोत कळायलाच हवे. जिद्दीने न चुकता नेटाने पूर्ण झोकून देऊन कामे करायचे आणि अजून चांगले वागता येईल का याची सतत तयारी करायची. 

             नोकरी  करणाऱ्या चार महिलांपेक्षा मी असे वेगळे काहीच करत नाही. पण मुद्दा असा आहे कि चार हात आणि २  डोकी असणाऱ्या रुपाची मनाला ओढ का असते. जे करेन ते Perfect  करेन. लग्नानंतर सून, नात-सून, वाहिनी, काकू या नात्यांची जबाबदारी का वाटते?आमच्या ऑफिस मधील महिला-मंडळाचा हा नेहमीचा प्रश्न आहे . बर नवरे लोक याचा आग्रह धरतात का ,तर मुळीच नाही ते खुश असतात आणि आपणही जमेल तेवढ करून खुश राहावे असेच सल्ले देतात. मला आठवत नाही कोणत्याही पुरुषाने इतके भावनीक होऊन मला लग्नानंतर नवरा, जावई ,नात-जावई , काका झाल्याची जाणीव होतीय,जबाबदारी वाटतीय असे सांगितले असेल  .ते दोन दिवसांचा विचार करतात आणि २ तासांनी काय विचार केला होता हे विसरून जातात. कारण लहानपणा  पासून असे  भावनिक जग घडायचे प्रसंग फार कमी येतात त्यांच्या वाट्याला . मला नाही वाटत कोणती आई तिच्या मुलाला कधीही हे वाक्य म्हणाली असेल कि 'उद्या तू कोणत्या तरी घराचा जावई होशील ,आता तरी चार भाज्या ओळखायला शिक!' पण मुलींना लहानपणा पासून काळजी,माया आणि आपुलकीची ,त्याला व्यक्त करण्याची कला अवगत असते. त्यातच घरातील सारे खत-पाणी घालतात. तिला चांगले शैक्षणिक जीवन देतात कि ज्याने ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल. पण तिच्या भावनिक जगाचे काय? त्यात तिला स्वतंत्र राहण्याची आणि त्यातून आत्म-निर्भर होण्याची गरज नाही का?
          माझ्या ओळखीच्या किती तरी काम करणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्या मला सांगतात कि 'मी दिवसभर मुलाला/मुलीला पाळणा घरात ठेवते/सासु-सासाऱ्यानकडे ठेवते, त्याचे मला खूप वाईट वाटते,म्हणून मग मुलांना कधी मी रागवत नाही घरी गेले कि त्यांचे खूप लाड करते'. हि धडपड 'perfect  आई' होण्याची . मी डबा नेत नाही म्हणून खूप जणी सांगतात बरे आहे तुझे सासू-सासरे नाही राहत न तुमच्या बरोबर ,मी तर पहाटे  ५ वाजता उठून स्वयंपाक करते ,आमच्याकडे चालत नाही असे काही. परत तेच 'चांगली सून' असण्याची धडपड. नोकरी नाही करणाऱ्या महिला पण याच शर्यतीमध्ये असतात. मुलांसाठी ,घरातील मोठ्यांसाठी किती तरी इच्छा  त्या पाण्यावर सोडून देतात, वेळे प्रमाणे लोणचे मुरते तश्या त्याही संसारामध्ये मुरत जातात. रूढी परंपरा पुढे चालवायला हरकत नाही पण समजून उमजून पुढे घेतल्या जात नाहीत. आधुनिक काळ आपण म्हणतो पण आज एक स्त्री म्हणून आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:बरोबर न्याय करतो का? आई, बहिण,मुलगी, बायको,सून,काकू,मामी, मावशी आणि बरीच नाती या पलीकडे आपले नाते आहे ना स्वत:शी . त्याला कधी न्याय मिलेल?!
हे सगळे लिहिता लिहिता वाटतंय कि बंधने हि मनाची आहेत . मनाला सारखे सांगायला हवे कि मी आधी माझ्यावर प्रेम करायला हवे. लोक काय म्हणतील या चौकटीमधून बाहेर पडायला हवे. मी स्वत: जीवनाचा माझ्या कला गुणांचा आदर करायला हवा. मी मनापासून खुश असेन तरच मी इतर लोकांना आनंद वाटू शकते, नवीन दिशांना आपलेसे करू शकते. मी माझे स्वतंत्र विचार जपायला हवे. Perfect असे या जगात काहीच नाही. कोणीतरी म्हणलेच आहे न कि कधी कधी अपूर्णतेमध्येच जीवनाची संपूर्णता मिळते!

मी आहे फुलपाखरू,मी रंग इंद्रधनुचे ,
मी झुळूक वाऱ्याची,मी वादळ भावनांचे, दर्पण मनाचे,
मी  उत्तर  कोड्याचे, मी वाहते पाणी झऱ्याचे,
मी थेंब बरसणारे, मी पक्षी आकाशी उडणारे
धरती मी मृदू शीतल, अंकुर  जन्म देणारी
मी  स्वप्नांची वाट, कधी शांत समई देवघरातील

मी नक्षत्रानची राणी, मी वीज आकाशातून कोसळणारी,
मी लाट समुद्र घेऊन येणारी,मी मनसोक्त गाणी
मी कधी ज्वाला कधी ज्योत, कधी सोनेरी पहाट
मी आरसा निसर्गाचा मी प्रकृतीच्या कणात  कणात !!!

2 comments:

Sneha said...

Khoop uttam lihila ahes. Agadi mazya manatale bollya sarkhe vatle.. kharach kiti attahas asto perfect bannyacha... bayko, sun, vahini etc. ani kami mhanun swaypak uttam zalach pahije ani ghar chakacha asayla havey.... khoop bhavla ha blog tuza mala...

sanjyoti said...

Very true!!